कुंडलवाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक; ‘डीजे’मुक्त साजरीकरणाचे आवाहन
अमरदीप दगडे
कुंडलवाडी (प्रतिनिधी):
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यावर्षी देखील जयंतीचे पावित्र्य अबाधित राहावे आणि उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कुंडलवाडी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. कुंडलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनच्या सभागृहात शांतता समितीची विशेष बैठक उत्साहात पार पडली.
प्रशासकीय मार्गदर्शन आणि सलोख्यावर भर
आज दि. ११ एप्रिल २०२६ रोजी संपन्न झालेल्या या बैठकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर शिंदे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. जयंती उत्सव शांततेत आणि शिस्तीत साजरा व्हावा, यासाठी त्यांनी पोलीस प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. तसेच, या बैठकीच्या माध्यमातून समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे विचार व मार्गदर्शन घडून आणत सर्वांना एका व्यासपीठावर आणण्याचे महत्त्वाचे कार्य शिंदे यांनी केले.
👉प्रशासनाचे आवाहन आणि महत्त्वाच्या सूचना:
मिरवणूक डीजेमुक्त आणि पारंपारिक वाद्यांनीच व्हावी: जयंती मिरवणूक डीजेमुक्त वातावरणात पार पाडावी आणि त्यात केवळ पारंपारिक वाद्यांचाच वापर करावा, असे स्पष्ट आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले.
👉सामाजिक सलोखा आणि धार्मिक भावनांचा आदर: मिरवणुकीदरम्यान इतर धर्मीयांच्या भावना दुखावतील असे गाणे, घोषणा किंवा बॅनर लावू नयेत. तसेच धार्मिक स्थळांच्या ठिकाणी मिरवणूक विनाकारण रेंगाळत ठेवू नये, याची दक्षता जयंती मंडळांनी घ्यावी.
वेळेचे आणि शिस्तीचे पालन: मिरवणूक ही पोलीस प्रशासनाने दिलेल्या परवान्यातील वेळेतच सुरू करून संपवावी. मिरवणुकीत कोणीही मद्यप्राशन करून गोंधळ घालणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी मंडळाची असेल.
👉आरटीओ नियम आणि वाहन चालकांची जबाबदारी: मिरवणुकीसाठी वापरण्यात येणारे वाहन आरटीओ नियमांनुसार असावे. चालकाकडे वैध परवाना असणे अनिवार्य असून, मिरवणुकीदरम्यान चालकाने वाहनावरच उपस्थित राहून सहकार्य करावे.
,👉सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या मंडळांचा होणार गौरव:
केवळ मिरवणूक न काढता जे मंडळ रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार किंवा व्याख्यान यांसारखे प्रबोधनात्मक सामाजिक उपक्रम राबवतील, अशा मंडळांना पोलीस प्रशासनाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल, असे श्री. ज्ञानेश्वर शिंदे यांनी यावेळी जाहीर केले.
या बैठकीला आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, पत्रकार बांधव, पोलीस पाटील आणि जयंती मंडळांचे पदाधिकारी असे ६० ते ७० नागरिक उपस्थित होते. सर्वांनीच पोलीस प्रशासनाच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे.