अमरदीप दगडे (जिल्हा प्रतिनिधी):
देगलूर येथील महात्मा फुले इंग्लिश मीडियम स्कूल मधील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कु. आराध्या साईनाथ नरवाड हिच्या “Effects of Tree Plantation on Temperature Around School” या नाविन्यपूर्ण वैज्ञानिक प्रयोगाची राज्यस्तरीय डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा साठी निवड झाली आहे. येत्या १५ मार्च रोजी मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फेरीत आराध्या आपला प्रयोग सादर करणार आहे.
आराध्याने या स्पर्धेतील थेअरी आणि प्रॅक्टिकल असे दोन्ही टप्पे अत्यंत यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. शालेय परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केल्यास आजूबाजूच्या परिसरातील तापमान नियंत्रणात ठेवण्यास कशी मदत होते, हे तिने प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे सिद्ध केले आहे. तापमानातील बदल, सावलीचा परिणाम, आर्द्रतेतील फरक आणि उष्णतेची तीव्रता यांचा अभ्यास करून तिने शास्त्रीय पद्धतीने निष्कर्ष मांडले आहेत.
स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात आराध्याने नांदेड येथील विविध शाळांना भेटी देत आपला प्रयोग सादर केला. यात Oxford The Global School, Sri Chaitanya School तसेच Shakuntala The School for Excellence या शाळांचा समावेश आहे. या ठिकाणी तिने शिक्षक व विद्यार्थ्यांसमोर वृक्षलागवडीचे महत्त्व आणि तापमान नियंत्रणातील त्याची भूमिका प्रभावीपणे मांडली. या भेटीदरम्यान ऑक्सफर्ड ग्लोबल स्कूलच्या वाणी मॅडम तसेच श्री चैतन्य स्कूलच्या पूजा माने मॅडम यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले.
आराध्याला नांदेडमधील वृक्षमित्र फाउंडेशन सोबत कार्य करण्याचा अनुभव असून या संस्थेचे संतोष मुगटकर सर यांचे तिला विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच तिने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील भू-विज्ञान विभागाला भेट देऊन विभागप्रमुख डॉ. वाघ सर यांचेही मार्गदर्शन घेतले. या शास्त्रीय मार्गदर्शनामुळे तिच्या प्रयोगाला अधिक भक्कम आधार मिळाला.
विविध शाळा व संस्थांना दिलेल्या भेटीदरम्यान आराध्याने तापमानवाढ, उष्णतेच्या लाटा (Heat Waves) आणि त्याचे होणारे दुष्परिणाम याविषयी विद्यार्थ्यांना व नागरिकांना सविस्तर माहिती दिली. तसेच वृक्षलागवड हीच तापमानवाढीच्या समस्येवर प्रभावी उपाय ठरू शकते, हे तिने प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे दाखवून दिले.
येत्या १५ मार्च रोजी मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत आराध्या आपला प्रयोग सादर करणार असून तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, मार्गदर्शक, पालक आणि समाजातील सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. देगलूरच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.