पहिली ते नववीची अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलपासून; शिक्षक-विद्यार्थ्यांना ४४ दिवसांची उन्हाळा सुट्टी; १५ जूनपासून सुरु होणार शाळा
अमरदीप दगडे (जिल्हा प्रतिनिधी): पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा २० ते ३० एप्रिल दरम्यान होतील.
शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना किमान २२० दिवस अध्यापन व्हावे, हा त्यामागील हेतू आहे.
दरवर्षी २८ दिवस सार्वजनिक सुट्ट्या, प्रत्येक आठवड्यातील रविवारच्या ५२ सुट्ट्या आणि ४४ दिवस उन्हाळा सुट्टी, अशा एकूण १२४ दिवस शाळा बंद असतात. त्यात सत्र परीक्षांचेही काही दिवस असतात. मात्र, शैक्षणिक वर्षातील ३६५ पैकी किमान २२० दिवस तरी विद्यार्थ्यांना अध्यापन व्हावे, असा निकष आहे. तरीपण, दरवर्षी मार्चअखेर अंतिम सत्र परीक्षा घेतली जायची.
परीक्षा झाल्याने एप्रिल महिन्यापासूनच विद्यार्थी शाळेला यायचे बंद व्हायचे. या पार्श्वभूमीवर अंतिम सत्र परीक्षा मागच्या वर्षीपासून एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्याचा निर्णय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (एससीईआरटी) घेतला. परीक्षेचा निकाल १ मे रोजी जाहीर होऊन २ मे पासून शाळांना उन्हाळा सुट्टी असेल, असेही शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
१५ जूनपासून दरवर्षीप्रमाणे सुरु होतील शाळा
शालेय शिक्षण विभागाच्या नियोजनानुसार पहिली ते नववीतील विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात होईल. २ मे पासून शाळांना उन्हाळा सुट्ट्या असतील. १५ जूनपासून दरवर्षीप्रमाणे शाळा सुरु होतील.