अमरदीप दगडे (जिल्हा प्रतिनिधी)
कुंडलवाडी : केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या NMMS (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना) परीक्षेचा यावर्षीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून कुंडलवाडी येथील मिलिंद विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यंदा विद्यालयातील तब्बल 40 विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले असून विद्यालयाच्या इतिहासातील हे अभूतपूर्व यश मानले जात आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणारी ही परीक्षा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सन 2014 पासून मिलिंद विद्यालयातील शेकडो विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होत शिष्यवृत्तीधारक झाले आहेत; मात्र एका वर्षात एकाच वेळी 40 विद्यार्थ्यांनी पात्रता मिळविणे ही विद्यालयासाठी विशेष अभिमानाची बाब ठरली आहे.
विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. कुणाल लोहगावकर, संचालक श्री. विजयकुमार लोहगावकर, मिलिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एच. एन. पांचाळ तसेच मिलिंद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर. डी. नरवाड यांनी NMMS विभाग प्रमुख व बुद्धिमत्ता चाचणीसाठी विशेष मार्गदर्शन करणारे श्री. बी. एम. गंगोणे यांचे विशेष अभिनंदन केले.
तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या विषय शिक्षकांमध्ये
श्री. कुंडलवाडीकर व श्री. फड (गणित)
श्री. चंदनकर व श्री. शेख (सामाजिक शास्त्र)
कु. तुरे व कु. कौठकर (विज्ञान)
यांच्यासह सर्व शिक्षकांचे कौतुक करण्यात आले.
विशेष म्हणजे मागील बारा वर्षांत या विद्यालयातून शेकडो विद्यार्थी NMMS परीक्षेत उत्तीर्ण झाले असून 100 हून अधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत. विद्यालयाच्या सातत्यपूर्ण यशाबद्दल पालक व समाजातील विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.