Dongav Budruk :
१५ मे रोजी सायंकाळच्या सुमारास डोणगाव बुद्रुक आणि परिसरात अचानक हवामानात मोठा बदल झाला. जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक गावांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अनपेक्षित हवामानामुळे शेती व्यवसायाला आर्थिक फटका बसला असून शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.
या वादळाचा सर्वाधिक परिणाम डोणगाव बुद्रुक येथील महिला शेतकरी प्रेमलाबाई गोपाळराव कुलकर्णी यांच्या शेतावर झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या गट क्रमांक ३५३ मधील शेतात बसवण्यात आलेली सोलर पॅनल यंत्रणा आणि त्यासोबतची महत्त्वाची वायरिंग वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली. तसेच शेती साहित्य आणि जनावरांसाठी उभारण्यात आलेला पत्र्याचा शेडही वाऱ्याच्या तीव्र वेगामुळे उडून गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या शेतांनाही काही प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक आलेल्या या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. आधीच वाढते उत्पादन खर्च, अनियमित पाऊस आणि बाजारातील चढ-उतार यामुळे शेतकरी त्रस्त असताना या नुकसानीमुळे चिंता अधिक वाढली आहे.
स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी संबंधित सोलर कंपनीने तातडीने घटनास्थळी पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करावा, तसेच नुकसानभरपाई द्यावी किंवा सोलर यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करून द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच प्रशासनानेही परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.