प्रशासकीय कामकाजात संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा जपण्याचे कोल्हापूर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे आवाहन
कोल्हापूर : 28 प्रतिनिधी सुरेश जाधव
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
कोल्हापूर, दि. २८ : प्रशासकीय कामकाजात संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा जपण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने केले. नागरिकांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी सेवाभावी वृत्तीने काम करणे हे प्रत्येक शासकीय घटकाचे आद्य कर्तव्य असल्याचे त्यांनी यावेळी नमूद करीत जास्तीत जास्त सेवा कमीत कमी कागदपत्रात आणि अधिक पारदर्शकपणे लोकांना द्या, असे आवाहनही केले.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात ‘सेवा हक्क दिन’ समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. त्यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावेळी लोकसेवेचे महत्त्व पटवून दिले. सेवा वितरणात उत्कृष्ट कार्य केलेल्यांचा सन्मानही यावेळी करण्यात आला. यात निवासी उपजिल्हाधिकारी कोल्हापूर गजानन गुरव, उपविभागीय अधिकारी करवीर मोसमी चौगुले, तहसीलदार सर्वसाधारण नेताजी सगट, तहसीलदार गडहिंग्लज ऋषिकेश शेळके, नायब तहसीलदार, पन्हाळा संजय वळवी, जिल्हा व्यवस्थापक, माहिती तंत्रज्ञान विभाग जयंत पाटील, वरिष्ठ अभियंता, माहिती तंत्रज्ञान विभाग गजानन दीपंकर, जिल्हा व्यवस्थापक आपले सरकार केंद्र.संदीप पाटील, आपले सरकार सेवा चालक केंद्र प्रमुख परशुराम केशव सरपाले, प्रशांत प्रदीप सिंहासने, जुबेर हरून मुजावर यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांनी कायद्यातील विविध तरतुदी सादरीकरणातून समजावून सांगितल्या. तसेच सर्व उपस्थित शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्तव्यपालनाची शपथ दिली. डिजिटल माध्यमांचा वापर करून जलद, पारदर्शक आणि विहित वेळेत सेवा मिळाव्यात, हा या सेवा हक्क अधिनियमाचा उद्देश असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार नाथाजी सगट यांनी केले, तर सूत्रसंचालन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी केले. उपजिल्हाधिकारी रूपाली चौगुले व तहसीलदार तेजस्विनी पाटील यावेळी उपस्थित होत्या.